वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. ' आधी पुनर्वसन - मगच धरण ' या कायद्यानुसार आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून मगच धरणाच्या बांधकामाला सुरुवात व्हायला हवी होती.मात्र मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऑक्टोबर २०२६ मधे धरणाच्या बांधकामास सुरुवात केली जाईल, असे जाहीर केले आहे. त्यातच ठेकेदाराने प्राथमिक स्वरूपाची तयारी करून धरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात लवकरच होईल, असे चित्र निर्माण केल्याने प्रकल्पग्रस्तांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रकल्पग्रस्तांनी आधी पुनर्वसन करा, मगच धरणाच्या कामाला सुरुवात करा, अशी मागणी करून आंदोलनाची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य स्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) विवेक पंडित यांनी तालुक्यातील वरीष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, धरणग्रस्त व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक दि. १६ जून रोजी आयोजित केली होती. या बैठकीमधे गारगाई प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा झाली व पुनर्वसन कायद्याचे पालन करूनच धरणाच्या बांधकामास सुरुवात करावी, असा निर्णय घेण्यात आला.
गारगाई प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुठे करणार ? याप्रश्नावर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाडा तालुक्यातील देवळी या गावी करणार असल्याचे सांगितले. त्यावर देवळी येथे जागा शिल्लक आहे का ? त्या जागेचा सर्व्हे झाला आहे का ? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारताच , ' सर्व्हे झालेला नाही ' असे उत्तर दिले. प्रत्यक्षात देवळी येथील संपूर्ण जागेवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर आहेत व वनअधिकार कायद्यानुसार आदिवासी भूमिहीनांना वनपट्टे देण्यात आले आहेत. महानगरपालिका सांगते त्या ठिकाणी जागाच शिल्लक नाही, मग पुनर्वसन कसे करणार? असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांनी विचारला. त्यावर विवेक पंडित यांनी, आधी जागेचा सर्व्हे करा, त्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न सोडवून मगच धरणाच्या बांधकामास सुरुवात करा, अशा सूचना केल्या. त्यांनी पर्यावरण प्रभाव अहवाल (EIA) जाहीर करण्याच्याही सूचना करून प्रकल्पग्रस्तांना जागेच्या बदल्यात जागा द्या, असेही सांगितले.
धरणाच्या प्राथमिक अभियंत्रकीचे काम सुरू झाले असताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत जागेचा कुठलाही निर्णय न झाल्याचे या बैठकीमधे उघड झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी आश्चर्य व्यक्त करून पुनर्वसन आधी करा, अशी मागणी लावून धरली आहे.
या बैठकीस प्रांतअधिकारी श्री. संदीप चव्हाण, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता सी.डी. चौधरी, कार्यकारी अभियंता सौरभ देशपांडे, वनअधिकारी धीरज ठोंबरे, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ, सरचिटणीस विजय जाधव व पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS